महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राजीनामा देणार असल्याची माहीती आहे. त्यांनी स्वतःच आपली राजीनाम्याची इच्छा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे व्यक्त करत ‘आपल्याला राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनाचा उर्वरित काळ चिंतन, मननात घालवायचा असल्याच’, सांगितलं आहे.
राज्यपालांनी आपली राजीनामा देण्याची इच्छा राजभवनाच्या प्रसिद्धीपत्रकात व्यक्त केली आहे. सध्या त्यांनी व्यक्त केलेल्या या इच्छेनंतर राज्यात चर्चा होत आहे. अनेक वादग्रस्त विधानांमुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे चर्चेत राहिले आहेत. आता काही नेत्यांकडून, नेटकऱ्यांकडून त्यांच्या इच्छेवर टीकाही होत आहे. कारण राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती करत असल्याने त्यांनी राजीनाम्याची इच्छा वा मागणी राष्ट्रपतींकडे व्यक्त करायला हवी होती, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
राजीनाम्याची इच्छा आणि प्रसिद्धीपत्रक:
“महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही. माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माननीय पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे, आणि आशा आहे की या संदर्भात देखील मला त्यांचा आशिर्वाद मिळत राहील,” असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले असल्याचे राजभवनाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in