जुलैच्या सुरुवातीपासून पावसाने महाराष्ट्राला झोडपून काढलंय. गेल्या 15 ते 20 दिवसांत राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस झाला.. मात्र, गेल्या 2-3 दिवसांपासून पावसाने काहीसी विश्रांती घेतली होती. त्यामुळे शेतातील रखडलेली कामे करण्यास शेतकऱ्यांना वेळ मिळाला…
शेतातील कामे लवकर आटोपून घ्यायला लागणार आहेत. कारण, राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. येत्या 3 -4 दिवसांत राज्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले.
विदर्भातही पावसाची शक्यता
विदर्भात आज-उद्या (रविवारी) पावसाला जोर राहणार असून, मराठवाड्याच्या काही भागातही पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.. चंद्रपूर व गडचिरोलीमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे..
गेल्या 24 तासांत कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मुंबईत मात्र पावसाने पाठ फिरविली आहे. मुंबई व उपनगरात ढग साचत असले, तरी प्रत्यक्षात पाऊस हुलकावणी देत असल्याचे दिसते..
राज्यात पुढील तीन-चार दिवस पावसाची शक्यता असल्याने, हवामान खात्याने राज्यभर अलर्ट जारी केला आहे. प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. भारताचा वायव्य व मध्य भारतात, तसेच उत्तर द्वीपकल्प, पूर्वेचा काही भाग आणि ईशान्येकडील काही भागांमध्येही पावसाची शक्यता आहे..
या जिल्ह्यांना अलर्ट – २४ जुलै : मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, नाशिक, नंदुरबार, जळगाव.