मुंबई : राज्यात गेल्या 8 दिवसांपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांच्या आणि धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून विविध ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. या मुसळधार पावसामुळे काही गावातील रस्ते पाण्याखाली जाऊन अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. भूस्खलन तसेच वीज पडल्याने राज्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे.
दुर्देवी गोष्ट म्हणजे मुसळधार पावसामुळे राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी 1 जूनपासून आतापर्यंत 102 लोकांचा दुर्देवी बळी गेला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यामध्ये 14 एनडीआरएफ आणि पाच एसडीआरएफ पथकांकडून अनेक ठिकाणी बचावकार्य सुरु आहे. आतापर्यंत NDRF व SDRF कडून 11 हजार 836 जणांना पूरातून सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे.
एवढेच नव्हे तर राज्यातील मुसळधार पावसाचा फटका हा माणसांसह जनावरांनाही बसला आहे. अनेक जनावरांना पावसामुळे जीव गमवावा लागला असून आतापर्यंत 183 जनावरांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, हवामान विभागाकडून राज्यातील बहुतेक जिल्ह्यांना येलो आणि ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे की, राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कमी असेल.