राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे.. उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर भाजपचे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असल्याचे बोलले जात होते.. मात्र, खुद्द फडणवीस यांनी मोठा बाॅम्ब टाकताना, आपण नव्हे, तर शिवसेनेच्या बंडखोर गटाचे नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे हे नवे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा केली..
भाजप नेते देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांनी आज (ता. 30) राजभवनावर जावून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली व सरकार स्थापनेचा दावा केला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी मोठी घोषणा केली.. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असून, आज सायंकाळी फक्त त्यांचाच शपथविधी होणार असल्याचे ते म्हणाले..
शिवसेना आमदारांची कुचंबणा
फडणवीस म्हणाले, की “2019 च्या विधानसभा निवडणुकीत जनतेने भाजप-शिवसेना युतीला कौल दिला होता. मात्र, निकालानंतर शिवसेना नेत्यांनी वेगळा निर्णय घेतला. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी करुन भाजपला बाहेर ठेवलं. खरंतर हा जनमताचा अपमान होता.”
महाविकास आघाडीकडून गेल्या अडीच वर्षात प्रचंड भ्रष्टाचार करण्यात आला. महाराष्ट्राच्या इतिहासात भ्रष्टाचार प्रकरणी दोन मंत्री जेलमध्ये जाणे, ही खेदजनक बाब होती. राज्य सरकारने शेवटच्या दिवशी औरंगाबादचे नाव ‘संभाजीनगर’ केले.. ते वैध मानले जाणार नाही, पण त्याला आमचं समर्थनच असल्याचे ते म्हणाले..
महाविकास आघाडीत शिवसेनेच्या आमदारांची कुचंबणा झाली. या सगळ्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतची युती तोडा, अशी मागणी केली.. मात्र, उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांऐवजी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना जास्त महत्त्व दिलं.. शेवटपर्यंत त्यांचीच कास धरुन ठेवली. असो, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न असल्याचे फडणवीस म्हणाले..