मुंबई :
सेवानिवृत्तीनंतर प्रत्येकाला आपलं आयुष्य सुखाचं जावं असं वाटत असतं. यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करत असतो. काहीजण नोकरी करत असतानाच यासर्व गोष्टींसाठी आर्थिक नियोजन करून ठेवत असतात. एफडी, म्युच्युअल फंड, शेअर्स, बॉण्ड्स, सोनं इत्यादींमध्ये गुंतवणूक करून पैसे बचत करण्यावर सगळ्यांचाच भर असतो. नागरिकांची ही गरज लक्षात घेऊन आता केंद्र सरकारने एक योजना सुरु केली आहे.
या योजनेचं नाव आहे अटल पेन्शन योजना. अटल पेन्शन योजनेच्या माध्यमातून बचत करून नागरिक दरमहा एक हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळवू शकतात. ही एक सरकारी योजना असून या योजनेत सेवानिवृत्ती निधीसाठी पैसे जमा करावे लागतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल पेन्शन योजनेचा प्रारंभ 2015मध्ये केला होता. अटल पेन्शन योजना ही प्रामुख्याने 18 ते 40 वर्षं वयोगटातल्या व्यक्तींसाठी आहे.
40 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींना अटल पेन्शन योजनेचा लाभ घेता येणार नाही. या योजनेअंतर्गत 20 वर्षांसाठी एक ठराविक रक्कम गुंतवावी लागते. ज्या व्यक्तीने गुंतवणूक केली आहे त्या व्यक्तीला वयाच्या 60 वर्षांनंतर पेन्शनचा लाभ मिळू शकतो.
अटल पेन्शन योजनेचं आर्थिक गणित हे अत्यंत सोपं आहे. जर तुम्हाला 60 वर्षांनंतर 5000 रुपये पेन्शन हवी असेल तर दरमहा 210 रुपयांची बचत करावी लागेल. या योजनेचं एक खास वैशिष्टय आहे, ते म्हणजे जर ही योजना कधीही बुडणार नाही. 2021-22 या आर्थिक वर्षात या योजनेत सुमारे 71 लाख नागरिक सहभागी झाले आहेत.