शेतकऱ्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे.. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात हरभरा शिल्लक असताना, केंद्र सरकारने अचानक हरभरा खरेदी हमीभाव केंद्रे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हरभऱ्याचे भाव कोसळण्याची भीती व्यक्त होत असून, शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.
राज्यात यंदा मोठ्या प्रमाणात हरभरा उत्पादन झाले.. शिवाय एकरी उत्पादनातही मोठी वाढ झाली. राज्यात सरासरी 32.83 लाख मेट्रिक टन हरभऱ्याचे उत्पादन अपेक्षित असताना, 8.20 लाख मेट्रिक टन वाढीव उत्पादन झाले. हमीभाव केंद्रावर 5230 रुपये प्रति क्विंटल या किमान आधारभूत दराने हरभरा खरेदी होत होता.
हमीभाव केंद्राकडून खरेदी बंद..
दरम्यान, हरभरा (Chana Crop) खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे सांगत, केंद्राकडून अचानक हरभरा खरेदी करणे थांबवण्यात आले आहे. राज्यात 23 मे रोजी दुपारपासून अचानक ‘पोर्टल’वर ऑनलाइन खरेदीची नोंदणी बंद झाली आहे.. खासगी व्यापाऱ्यांकडून 4500-4800 रुपये प्रती क्विंटल दराने हरभरा खरेदी होत आहे..
चांगल्या प्रतीचा हरभरा बाजारात विकण्यास गेल्यास हमीभावापेक्षा कमी दराने त्याची विक्री होते. त्यामुळे शेतकरी द्विधा अवस्थेत सापडले आहेत. शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे..
विशेष म्हणजे, काही केंद्रांवर हरभरा खरेदी केला असला, तरी पोर्टलवर त्याची ऑनलाइन नोंदणी झालेली नाही, तर काही ठिकाणी हरभरा खरेदीसाठी शेतकऱ्यांना ‘एसएमएस’ पाठविले, परंतु त्यांची खरेदी बाकी होती, अशा हजारो शेतकऱ्यांच्या हरभऱ्याला किमान आधारभूत दर मिळेल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्यातील शिल्लक हरभऱ्याचा मुद्दा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही उपस्थित झाला होता. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, की राज्यात मोठ्या प्रमाणात हरभरा उत्पादन झाला आहे. त्यामुळे हरभरा खरेदीसाठी 28 जूनपर्यंत हमीभाव केंद्रांना मुदतवाढ देण्याची विनंती केंद्र शासनाला केली असून, त्यासाठी पाठपुरावा करीत आहोत.