गेली दोन वर्षे महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरु होता. त्यामुळे सारे काही ठप्प झाले होते.. शासकीय नोकर भरतीवरही निर्बंध घालण्यात आले होते. मात्र, आता हे मळभ दूर झालेय.. जनजीवन पूर्वपदावर येतेय.. त्यामुळे सरकारी नोकर भरतीवरील निर्बंधही हटवण्यात आले असून, लवकरच राज्यात विविध विभागात भरती केली जाणार आहे..
पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी नुकतेच पशुसंवर्धन विभागात मोठी नोकर भरती केली जाणार असल्याचे संकेत दिले. ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले जाईल. तसेच बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देणार असल्याचे ते म्हणाले.
ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बळकटीरणासाठी पशुसंर्वधन विभागात लवकरच 2500 पदे भरली जाणार आहेत. या नोकर भरतीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात आला आहे. त्यास लवकर मंजूरी मिळवण्यासाठी पाठपुरावा करीत असल्याची माहिती मंत्री केदार यांनी दिली..
नागपूरमधील माहूरझरी येथे पशुवैद्यकीय दवाखान्याच्या (उपकेंद्र) लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. मंत्री केदार म्हणाले, की “शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी पशुपालन हा अतिशय महत्वाचा घटक आहे. कोरोना काळात पशुपालन व्यवसायाने शेतकऱ्यांना मोठी मदत केली. त्यामुळे आता पशु व पक्षी पालनातूनच स्थानिक रोजगार निर्मितीवर भर दिला जाणार आहे..”
“पशुवैद्यकीय रुग्णालयांमुळे स्थानिक स्तरावर शेतकऱ्यांच्या जनावरांना आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध झाल्या. परिणामी, पाळीव जनावरांचे आरोग्य चांगले राहण्यास मोठी मदत होते. सुदृढ जनावरांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे,” असे ते म्हणाले.
‘हा’ प्रयोग राज्यात राबवणार..
कोरोनाचे संकट सुरु असतानाही नागपूर जिल्हा परिषदेने दुधाळ जनावरे, शेळी व गायींचे वाटप केले होते. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना चांगला आधार मिळाला.. त्यामुळे या योजनेतील त्रुटी दूर करुन हा प्रयोग राज्यभर राबवण्यात येणार असल्याचे मंत्री केदार यांनी सांगितले..