कोरोनामुळे ‘आयपीएल’मधील लिग सामने पुण्या-मुंबईतील मैदानांतच खेळवले गेले. कोरोनाचे संकट कमी झाल्याने आता प्ले-ऑफचे सामने कोलकता व अहमदाबादमध्ये खेळवले जाणार आहे.. ‘प्ले-ऑफ’साठी चारही संघ निश्चित झालेले असताना, कलकत्ता येथील ईडन गार्डन मैदानावर होणाऱ्या पहिल्याच मॅचवर मोठे संकट कोसळले आहे..
ईडन गार्डनवर उद्या (मंगळवारी) ‘गुजरात टायटन्स’ विरूद्ध ‘राजस्थान रॉयल्स’ यांच्यात प्ले-ऑफमधील पहिला सामना खेळला जाणार आहे.. सध्या पॉईंट टेबलमध्ये गुजरात टॉपर असून, राजस्थानची टीम दुसऱ्या क्रमांकावर आहे. या सामन्यातील विजेता थेट फायनलमध्ये जाणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये या मॅचबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे..
‘काल बैसाखी’चा प्रभाव
पश्चिम बंगालमध्ये सध्या ‘काल बैसाखी’ वादळाचा प्रभाव आहे. त्यामुळे कोलकातामध्ये नुकताच वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. त्यात ‘इडन गार्डन्स’चं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. स्टेडिअममधील होर्डिंग कोसळले, ‘आऊट फिल्ड’ झाकण्यासाठी घातलेले कव्हर्स उडून गेले..
पश्चिम बंगालमध्ये झालेल्या या वादळाचा फटका ‘गुजरात’ संघालाही बसला.. वादळामुळं त्याचं विमान उशीरा कोलकतामध्ये दाखल झालं. पावसामुळे ‘आऊट फिल्ड’ ओले झालेले असल्याने गुजरात संघाला सराव करता आला नाही.. ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी तातडीनं ‘इडन गार्डन्स’ची पाहणी केली. मॅचआधी दुरूस्तीची कामे केली जातील, असे ते म्हणाले..
दरम्यान, हवामान खात्याने कोलकत्तामध्ये पुढील दोन-तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पहिल्या क्वालिफायरच्या दिवशीही सायंकाळी पाऊस पडू शकतो. त्यामुळे ही मॅच होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे..
मॅच न झाल्यास…
‘आयपीएल’ स्पर्धेच्या व्यस्त वेळापत्रकामुळे प्ले-ऑफमधील मॅचसाठी राखीव दिवस ठेवलेला नाही. पावसामुळे हा सामना रद्द करण्याची वेळ आल्यास, पॉईंट टेबलमध्ये टॉपवर असलेली गुजरातची टीम सरळ फायनलमध्ये जाईल.. तर राजस्थानला ‘क्वालिफायर-2’ खेळावा लागेल. ‘आयपीएल’ची फायनल रविवारी (29 मे) अहमदाबादमध्ये होणार आहे.