भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील वन-डे मालिकेला येत्या 6 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. ‘विराट पर्व’ संपल्यानंतर नव्या वर्षात (2022) भारतीय भूमिवर ‘टीम इंडिया’ नव्या कॅप्टनसह प्रथमच मैदानावर उतरणार आहे. या मालिकेसाठी रोहित शर्मा फिट असून, तो संघाची धुरा सांभाळताना पाहायला मिळणार आहे..
दरम्यान, वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्याच लढतीत भारतीय संघात मोठ्या प्रमाणात बदल होणार असल्याचे संकेत मिळत आहे.. विशेष म्हणजे, आक्रमक फलंदाज व विकेट किपर रिषभ पंत याच्याकडे उपकर्णधारपद दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले..
दक्षिण आफ्रिका दौऱ्यात कसोटी व वन-डे सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाचा मोठा पराभव झाला.. दुसरीकडे वेस्ट इंडिज संघाने बलाढ्य इंग्लड संघाच्या चांगलेच नाकीनव आणले होते… त्यामुळे घरच्या मैदानावर भारतीय संघ कशी कामगिरी करतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे..
गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर ही वन-डे मालिका खेळवली जाणार आहे. तत्पूर्वी या मालिकेसाठी टीम इंडियातील खेळाडूंना तीन दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावा लागणार आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी कॅप्टन रोहित शर्मा पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. शिखर धवन याच्यासोबत तो सलामीला उतरणार, हे निश्चित आहे. त्यामुळे ऋतुराज गायकवाडला पुन्हा एकदा ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घ्यावी लागेल. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी यांना विश्रांती दिल्याने दीपक चहर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा यांच्यावर जबाबदारी असेल.
रिषभ पंत उपकर्णधार होणार..?
दरम्यान, विकेटकिपर रिषभ पंत याला उपकर्णधार केले जाणार असल्याचे समजते.. पहिल्या सामन्यात उपकर्णधार लोकेश राहुल खेळणार नसल्याचे ‘बीसीसीआय’ने आधीच स्पष्ट केले होते. त्यात जसप्रीत बुमराह यालाही या मालिकेत विश्रांती दिल्याने उपकर्णधार पदासाठी संघ व्यवस्थापनासमोर रिषभ पंतचं नाव आघाडीवर आहे.
‘बीसीसीआय’च्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ”हा फक्त एका सामन्याचा प्रश्न आहे. लोकेश राहुल दुसऱ्या वन-डेसाठी संघात परतणार आहे. सध्या शिखर धवन व रिषभ पंत हे दोन्ही उपकर्णधार पदासाठी दावेदार आहेत. पण, संघ व्यवस्थापनाला गरज वाटल्यास, उपकर्णधार निवडला जाईल, अन्यथा पहिल्या वन-डेत उपकर्णधार पद रिक्त ठेवलं जाईल..”
‘आयपीएल’मध्ये रिषभ पंत ‘दिल्ली कॅपिटल्स’चा कर्णधार आहे. भविष्यात ‘टीम इंडिया’चा कर्णधार म्हणून रिषभला तयार करण्याचा विचार सुरू आहे. त्यासाठी आतापासून तयारी केली जात आहे. सध्याच्या घडीला लोकेश राहुल व रिषभ हे दोन सक्षम पर्याय समोर आहेत..,”असेही अधिकाऱ्यानं सांगितले.
भारताचा वन डे संघ – रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान.