‘क्रिकेटचा देव’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.. ‘बीसीसीआय’च्या अध्यक्षपदावर माजी कॅप्टन सौरभ गांगुली आल्यापासून भारतीय क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणात बदलाचे वारे वाहत आहेत..
‘दी वॉल’ अशी ओळख असणाऱ्या राहुल द्रविडला टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक करण्यात आले.. ‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ लक्ष्मणची द्रविडच्या जागी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या (NCA) प्रमुखपदी निवड झाली.
गांगुली स्वत: ‘बीसीसीआय’ अध्यक्ष असल्याने, भारतीय क्रिकेटमध्ये गांगुली-द्रविड-लक्ष्मण हे त्रिकुट एकत्र पाहायला मिळत आहे.. मात्र, या साऱ्यांमध्ये एका व्यक्तीची उणीव जाणवत होती, तो म्हणजे सचिन तेंडुलकर..!
दरम्यान, आता सचिनची ही उणीवही भरून निघणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे या ‘फॅब फोअर’चा जलवा वेगळ्या रुपात का होईना, भारतीय क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा सचिन वेगळ्या भूमिकेत दिसणार असल्याचे संकेत खुद्द ‘दादा’नेच दिले.
दादा काय म्हणाला..?
एका कार्यक्रमात बोलताना गांगुली म्हणाला, की ”सचिन तेंडुलकर थोडा वेगळा आहे. त्याला या सर्व गोष्टींमध्ये भाग घ्यायला आवडत नाही. भारतीय क्रिकेटमध्ये सचिनला कोणत्या मार्गाने सहभागी करुन घेता येईल, याबाबत विचार सुरु आहे.. अर्थात येथे हितसंबंध (conflict of interest) जपण्याचा मुद्दाही उपस्थित होऊ शकतो. मला कधी कधी हे अवास्तव वाटते..”
भारतीय क्रिकेटसाठी सर्वोत्तम व्यक्तीचे योगदान कसे मिळविता येईल, यासाठी योग्य मार्ग काढायला हवा. सचिनही त्यातून मार्ग काढेल नि भविष्यात भारतीय क्रिकेटमध्ये तो नक्की वेगळ्या भूमिकेत दिसेल, असा विश्वास गांगुलीने व्यक्त केला.
सचिन तेंडुलकर काही काळ क्रिकेट सल्लागार समितीवर होता. तसेच, सध्या तो आयपीएलमध्ये ‘मुंबई इंडियन्स’चा मेंटॉर म्हणून काम पाहतोय. ‘बीसीसीआय’ त्याच्यावर नेमकी कोणती जबाबदारी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306065