कोरोना संकटाचा प्रत्येक घटकालाच फटका बसला. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, उद्याेग-धंदे बसले. अनेक जण बेरोजगार झाले. सरकारी पातळीवरही फारशी चांगली परिस्थिती नव्हती. कर वसूली ठप्प झाल्याने राज्याच्या तिजोरीत खडखडाट झाला..
राज्य परिवहन महामंडळाची एसटी बसही कोरोना संकटातून सुटली नाही. लाॅकडाऊन करण्यात आल्याने एसटी चाक थांबले. एसटी आधीच अडचणीत होती, कोरोनामुळे तर ती आगीतून फुफाट्यात पडली. त्यातून सावरण्यासाठी एसटी मंडळाने मालवाहतूक करण्याचा निर्णय घेतला.
एसटीने मालवाहतूक सुरु करण्यात आल्याने काहीतरी उत्पन्न सुरु झाले, पण ते पुरेसे नव्हते. त्यातून एसटीच्या देखभाल-दुरुस्तीचाही खर्च निघत नव्हता, तर कर्मचाऱ्यांचे पगार कसे करणार..?
आधीच तुटपूंज्या पगारावर काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे पगारच बंद झाले. त्यांच्या कुटुंबावर अगदी उपासमारीची वेळ आली. त्यातून काहींनी थेट गळ्याला फास लावला नि कायमची सुटका करुन घेतली.
दरम्यान, आता कोरोनातून देश सावरतोय.. राज्य अनलाॅक होतेय.. शाळा-महाविद्यालये, मंदिरे सुरु झालीत. जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. राज्यातील सगळ्या गोष्टी सुरळीत होत असताना, एसटीचे चाकही पूर्वीच्या जोमाने फिरू लागले आहे.
‘आवडेल तिथे प्रवास’
‘प्रवाशांच्या सेवे’साठी हे ब्रीदवाक्य घेऊन राज्य परिवहन महामंडळ नागरिकांसाठी पुन्हा एकदा सुरक्षित प्रवास उपलब्ध करून देत आहे. दिवाळीचे औचित्य साधून एसटीने प्रवाशांना ४ आणि ७ दिवसांत ‘आवडेल तिथे प्रवास’ करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
राज्यातील बसस्थानकात त्यासाठी आरक्षण केंद्र सुरु केले असून, तेथे ‘पास’ काढता येणार आहे. प्रवाशांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन राज्य परिवहन विभागाने केले आहे.
साध्या सेवा (साधी, जलद, रात्रसेवा, शहरी, यशवंती (मिडी), हिरकणी (निमआराम), शिवशाही व आंतरराज्य सेवेच्या (साध्या, निमआराम व शिवशाही) बसेसना ही योजना लागू आहे. उच्च दर्जाच्या सेवेचा पास निम्न दर्जाच्या सेवेस वैध राहील. प्रवास सुरू होण्याच्या १० दिवस आधी पास मिळेल.
📣 तुम्ही ग्रुप अॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511