राज्याच्या महिला मंत्री अपघातातून बालंबाल बचावल्या..! पिकअपच्या धडकेत कारचे मोठे नुकसान, पाहा कसा झाला हा अपघात..?
राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या कारला आज (शनिवारी) सकाळी हिंगोलीत पिकअपची धडक बसली. या अपघातातून शिक्षणमंत्री गायकवाड थोडक्यात बचावल्या. मात्र, अपघातात त्यांच्या कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
शिक्षणमंत्री असणाऱ्या वर्षा गायकवाड (Varsh Gaikwad) या हिंगोलीच्या पालकमंत्रीही आहेत. मागील दोन दिवसांपासून त्या हिंगोलीच्या दौऱ्यावर गेल्या होत्या. हिंगोलीतील ऑक्सिजन प्रकल्पाचे आज सकाळी गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटनानंतर सकाळी मंत्री गायकवाड तेथील रामलीला मैदानाची पाहणी करण्यासाठी निघाल्या होत्या. त्यावेळी अचानक मागील बाजूने त्यांच्या कारला पिकअपची जोरदार धडक बसली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातात कोणीही जखमी झालेले नसल्याची माहिती खुद्द मंत्री गायकवाड यांनीच दिली.
अपघातातून मंत्री गायकवाड बालंबाल बचावल्या. तसेच त्यांच्यासोबतच्या कोणालाही इजा झालेली नाही. मात्र, या अपघातात मंत्री गायकवाड यांच्या कारचे मागील बाजूने मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, हिंगोलीच्या पालकमंत्री असणाऱ्या शालेय शिक्षणमंत्री गायकवाड या हिंगोलीतील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी कालपासून (शुक्रवार) हिंगोलीच्या दौऱ्यावर आहेत. हिंगोलीतील नियोजित कार्यक्रमानुसार रामलीला मैदानाकडे जाताना त्यांच्या कारला हा अपघात झाला.
राजीव सातव यांच्या कार्याला उजाळा
हिंगोलीतील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री गायकवाड यांनी काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या कार्याला उजाळा दिला. कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन ऑक्सिजनबाबत हिंगोलीला स्वयंपूर्ण करण्यासाठी बंधू (स्व) राजीवजी सातव यांनी अतोनात प्रयत्न केल्याचे त्या म्हणाल्या.
‘आरटीआय’चे उल्लंघन केल्यास शाळांवर कारवाई
कोरोना काळात शुल्कवाढ करणाऱ्या मुंबई, नवी मुंबईतील 8 शाळांचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र रद्द करण्याचा प्रस्ताव शिक्षण संचालकांकडे सादर करण्यात आला असून, याबाबत लवकरच अंतिम निर्णय जाहीर करणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.