मुंबई – मॉन्सूनच्या अंदाजामुळे शेतकरी, सामान्यांना अतिवृष्टी, ओला दुष्काळ, उष्णतेची लाट, थंडीची लाट, अशा संभाव्य संकटापासून वाचण्यासाठी उपाययोजना करता येतात. सरकारलाही नैसर्गिक संकटांसोबत लढण्यासाठी तयारी करण्यास वेळ मिळतो. त्यादृष्टीने सगळ्यांचेच लक्ष पावसाच्या अंदाजावर लागलेले असते.
भारतात सलग तिसऱ्या वर्षी यंदाही चांगला पाऊस पडेल, असा अंदाज स्कायमेट संस्थेने यंदाच्या मॉन्सून हंगामासाठी वर्तवला आहे. यावर्षी १ जूनपासून मॉन्सूनला सुरूवात होईल. यंदा मॉन्सून हा सरासरीपेक्षा अधिक चांगला असेल, असा अंदाज स्कायमेटने व्यक्त केला आहे.
भारतात यंदा मॉन्सूनच्या कालावधीत, म्हणजेच जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरी ९०७ मिलीमीटर पाऊस होऊ शकतो, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. साधारण दरवर्षी मॉन्सूनच्या कालावधीत भारतात ८८०.६ मिलीमीटर इतका पाऊस पडतो. या कालावधीला लॉन्ग पिरियड एव्हरेज (एलपीए) असे म्हणतात.
यंदा पश्चिम भारतात मुंबईसह महाराष्ट्राला चांगल्या पावसासाठी सप्टेंबरची वाट पहावी लागेल, असे स्कायमेटच्या अहवालात नमुद केले आहे.
यंदाच्या मॉन्सून हंगामात भारतात १०३ टक्के पावसाची नोंद होईल, असे स्कायमेटने जाहीर केले आहे. भारतात ८८०.६ मिलीमीटर पाऊस झाला, तर १०० टक्के पाऊस पडल्याचे मानण्यात येते. त्यामुळेच यंदा ९०७ मिलीमीटर पावसाच्या अंदाजामुळे १०३ टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मॉन्सूनच्या अंदाजात ९६ ते १०४ टक्के पाऊस हा सरासरी पाऊस म्हणून ओळखला जातो. २०१९ मध्ये पावसाची टक्केवारी १०० टक्के, तर २०२० मध्ये १०९ टक्के होती.
यंदा जूनमध्येच १७७ मिलीमीटर, जुलैमध्ये २७७ मिमी, ऑगस्टमध्ये २५८ मिमी, तर सप्टेंबरमध्ये १९७ मिमी पावसाचा अंदाज आहे. गेल्या वर्षी ज्या भागात पावसाने पाठ फिरवली होती, तेथे यंदा चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. जूनमध्ये बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये चांगला पाऊस होऊ शकतो.
जुलैमध्ये महाराष्ट्र, छत्तीसगढ, ओरिसा आणि आंध्र प्रदेशात चांगल्या पावसाचा अंदाज आहे, तर दक्षिण-पूर्व भारतात आणि कर्नाटकात यंदा कमी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
महाराष्ट्रासाठी कसा होणार पाऊस?
सप्टेंबरमध्ये मध्य प्रदेश, तसेच देशातील पश्चिम भागात म्हणजे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये चांगला पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मुंबईत जूनमध्ये पावसाला सुरुवात होईल.
गेल्या वर्षी चांगल्या पावसाच्या जोरावरच रब्बी हंगामात शेती उत्पादनात नवीन उच्चांक गाठणे शक्य झाले होते. क्रिसिलच्या आकडेवारीनुसार, देशात नोव्हेंबर २०२० पर्यंत एकुण ३४८ लाख हेक्टरवर लागवड झाली होती. त्या आधीच्या वर्षी ही लागवड ३३४ लाख हेक्टर होती. त्यामुळे गेल्या वर्षी ४ टक्के अतिरिक्त शेतीउत्पादनात वाढ झाली. तर गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत ही वाढ ५ टक्के अधिक होती.