कोरोनाचा संसर्ग देशभरात दिवसेंदिवस वाढतच आहे. या सर्व रुग्णसंख्येच्या वाढीमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल आहे. देशभराच्या आकडेवारीने आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील अनेकांची झोप उडवली आहे. भारतात विविध राज्यांमध्ये लागलेला लॉकडाउन हा आर्थिक स्थिती साठी फारसा चांगला नसला तरी, जीवितहानी होऊ नये म्हणून राज्य आणि केंद्र सरकार आपापल्या परीने प्रयत्न करताना दिसत आहेत.
पहिल्या लाटेमध्ये वृद्धावस्थेतील लोकांना जास्त जपण्याची गरज होती. कारण, संसर्गाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात वृद्ध लोकांना त्रास होत होता. या लाटेमध्ये मात्र, लहान मुलांना आणि किशोरवयीन मुलांना लागण मोठ्या प्रमाणावर होत आहेत त्याचबरोबर लक्षणे नसलेली रुग्ण संख्या जास्त असल्याचे आढळले आहे.
पहिल्या लाटेमध्ये 20 हजारांवरून 1 लाखापर्यंत रुग्णसंख्या जायला 75 दिवसांचा कालावधी लागत होता. तोच आता 25 दिवसावर आला आहे. यावरूनच, आपल्याला कोरोना बाबतीत किती सतर्क राहायची गरज आहे याचे गांभीर्य कळेल.
गेल्या 24 तासात देशभरात 1 लाख 3 हजार 558 रुग्ण सापडले असून, यातील मोठ्या प्रमाणावर संख्या ही महाराष्ट्रातल्या रुग्णांची आहे.
महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, छत्तीसगड, दिल्ली, मध्यप्रदेश, पंजाब, या राज्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, देशभरातील जवळजवळ 82 टक्के रुग्ण हे या राज्यांमधून आहेत.
रिकवरी रेट हा 92.80 टक्के जरी असला, तरीदेखील गेल्या 25 दिवसात सलग मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत असल्याने देशाच्या चिंतेत भर पडली आहे. 1 कोटीच्या वर लोकांना कोरोनाची लागण आतापर्यंत झालेली असून देशभरात धोरणाने हाहाकार माजवला आहे.
महाराष्ट्रमध्ये 30 एप्रिल पर्यंत मिनी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली असून, महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंधांचे पालन करण्यात येत आहे.
वाढत्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येबरोबरच आरोग्य यंत्रणा देखील तेवढीच प्रबळ करणे हे देशापुढे मोठे आव्हान आहे. अनेक ठिकाणी वाढती कोरोनाग्रस्तांची संख्या ही उपचारआधीन असलेले आणि सहव्याधी रुग्ण यांच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते. त्यामुळेच सर्वांनी निर्बंधांचे पालन करणे ही गोष्ट गरजेची झाली आहे.